‘विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करा’, अण्णा हजारेंच मुख्यमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Anna-Hazare.jpg)
अहमदनगर | फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेला लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधानसभेत सादर करून लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
शासन प्रशासनामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी जेणेकरून स्वच्छ शासन व स्वच्छ प्रशासन निर्माण होईल. तसेच गैरव्यवहाराला आळा बसावा हा लोकपाल, लोकायुक्त कायद्याचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हाती अधिकार मिळावा. क्लास एक ते चारचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या गैरव्यवहाराचा कोणत्याही नागरिकांना पुरावा मिळाला तर ते पुराव्यांच्या आधाराने केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी करतील त्यानुसार लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर करण्याची मागणी अण्णांनी केली आहे.
‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी केलेल्या उपोषणावेळी ग्रामसभेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची १० मार्च २०१९ रोजी मसुदा समिती तयार करण्यात आली व समितीने अनेक बैठका करत मसुदा तयार केला.’
‘तरी राज्याच्या हिताकरिता देशाला माहितीचा अधिकार प्रमाणे मार्गदर्शक ठरेल असा सशक्त लोकायुक्त कायदा मसुदा समितीने बनविलेल्या मसुदयाचा विचार करून लवकरात विधानसभेत लोकायुक्त कायदा करावा.’ अशी मागणी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.