विठ्ठल मंदिर उघडा, वारकऱ्यांसोबत आंदोलन करणार – प्रकाश आंबेडकर
पंढरपूर |महाईन्यूज|
वारकरी संप्रदायाने लॉकडाऊनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. करोना संक्रमणामुळं गेल्या साडे पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत. वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजपच्या सोबत असलेला वारकरी वंचित कडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे.
लॉकडाउनमुळं विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील, अशा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
सध्या पंढरपूर मध्ये २०३५ कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने २४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. या विषयावर वाद पेटला असताना सर्वसामान्य वारकरी मात्र या वादापासून अलिप्तच आहेत.