वारकरी अधिवेशन: संभाजी भिडेंना आळंदीत येण्याची परवानगी नाकारावी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रीय वारकरी सेना व हिंदू जनजागृती समिती आयोजित श्रीसंतज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यव्यापी चौदावे वारकरी अधिवेशन आळंदी येथे आयोजित केले आहे. यामध्ये भीमा कोरेगाव प्रकरणातील वादग्रस्त संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या भडकाऊ भाषणामुळे सामाजिक तेड निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आळंदीत येण्यापासून प्रतिबंद घालण्यात यावा, अशी मागणी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील फिर्यादी अंजना सचिन गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात गायकवाड यांनी प्रसिध्दीसाठी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 4) या अधिवेशनात संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये चुकीच्या मागण्यांचे ठराव केले जाणार आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार आहे. मुळात, भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात भिडे आणि मिलींद एकबोटे यांच्यावर पिंपरीत पहिला गुन्हा दाखल झाला. त्याची फिर्याद मी स्वतः दिली आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले आहे.
त्यातच भीमा कोरेगाव शौर्य दिन अवघ्या 25 दिवसांवर (1 जानेवारी) आला आहे. या शौर्यभूमीपासून जवळच आळंदी आहे. येथे माउली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भव्य अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात भिडे भडकाऊ भाषण करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असंविधानिक मागण्या ते करणार असल्याचीही माहिती आहे. त्यांच्या भाषणामुळे पुन्हा सामाजिक तेढ निर्माण होऊन दंगल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भिडे यांना आळंदीत येण्यापासून रोखावे, अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे, असे अंजना सचिन गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे.