वारंवार होणारे लॉकडाऊन थांबवा – माजी मंत्री बबनराव लोणीकर
परभणी : लॉकडाऊन बाबतच्या केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करून अत्यावश्यक असल्यासच लॉकडाऊन करावे, अन्यथा जनतेस वेठीस धरू नये, असे मत माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले. लॉकडाऊन करणे हा कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यावरचा अंतिम उपाय नाही.
अत्यावश्यकपणे लॉकडाऊन करणे गरजेचे असले तरी वारंवार करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे जनसामान्यांच्या व्यवहारावर त्याचा गंभीर परिणाम होत असून अनेकांचे व्यवहार अडचणीत येत आहेत. त्याच बरोबर जनसामान्यात भितीचे वातावरण ऩिर्माण होत आहे. परभणी जिल्ह्यात वारंवार लॉकडाऊन करण्यात येत असून त्याचा मोठा परिणाम होत आहे.
त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे लॉकडाऊन करावे, रुग्ण आढळल्यास त्या गावाला किंवा तेवढ्याच क्षेत्राला प्रतिबंधीत करणे योग्य आहे. परंतू संपूर्ण जिल्ह्यास वेठीस धरणे अयोग्य असल्याचे मत आ.लोणीकर यांनी व्यक्त केले आहे.