वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत करण्यासाठी अदानी ग्रुपचे CEO राज ठाकरे यांच्या भेटीला
![Court notice to Raj Thakray to be present over amazon issue](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/raj-thakarey.jpg)
मुंबई – राज्यात वीजबील लोकांना अधिकचे वाढवून दिल्याबद्दल मनसेने आंदोलन केले होते त्यानंतर आज अदानी ग्रुपचे CEO कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. वाढीव वीज बिला संदर्भात चर्चा सुरू आहे.
तसेच आरेचे शिष्टमंडळ देखील कृष्णकुंजवर आले आहेत. आरे वाचवल्याबद्दल राज ठाकरेंचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच, अदानी यांच्यासोबत काय बातचीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. बिल कमी करणार का की पुन्हा मनसे आक्रमक होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
कोरोना काळात जी वीज बिलं आली आहेत, ती खूप जास्त आहेत. जनतेचा आक्रोश वाढत जाईल. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.
“राज्य सरकारसोबत ‘अदानी ग्रुप’ने लवकर वाटाघाटी करावी. मनसे जनतेसोबत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नाचे साधन नाही, कोणाचे पगार कमी झाले, अशात आलेली वीज बिले खूप जास्त आहेत. जनतेला वीज बिलात दिलासा दिला नाही, तर त्यांचा उद्रेक होईल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण राहणार नाही” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
‘अदानी ग्रुप’ हे व्यवसाय करत आहेत, हे मान्य आहे, मात्र अशा अपवादात्म्क परिस्थितीत व्यवसाय बाजूला ठेवा आणि मार्ग काढा” अशा सूचना त्यांना दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. “आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नयन कदम याचा कित्येक दिवस पाठपुरावा करत आहेत, त्यांच्या नेतृत्वात अनेक भेटीगाठी झाल्या. त्यामुळे यातून लवकरात लवकर पण कसाही मार्ग काढा” असे ‘अदानी ग्रुप’ला सांगितल्याचे नितीन सरदेसाई म्हणाले.