लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमी आणि दर जास्त; श्रावणात होणार भाज्यांची टंचाई…
मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना म्हटलं की नॉनवेजप्रेमींना चिकन,मटण ,मच्छीला तिलांजली द्यावी लागते..आणि मग काय भाज्या एके भाज्या. शाकाहार सुरू झाला की, भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार हे नक्की आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहेत. या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर किलोमागे ५० ते ६५ रुपये झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपला खिसा रिकामी करावा लागत आहे. श्रावण महिन्यात भाज्यांची आवक वाढली नाही तर टंचाई अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारात अजूनही २५० ते २७० गाड्या भाजीपाला येत आहे. तोही किरकोळ बाजारात व्यवस्थिपणे पोहोचत नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचण येत आहे. सध्या घाऊक बाजारात अनेक पसंतीच्या भाज्यांचे दर मागच्या महिन्यापेक्षाही अधिक वाढले आहेत. मागच्या महिन्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच ४० ते ५० रुपये किलो झाल्या होत्या. तर आता हे दर ६५ रुपये किलोच्या घरात गेले आहेत. हे दर असेच वाढतच राहिल्यास श्रावणात ग्राहकांना महागड्या भाज्या खरेदी कराव्या लागण्याची शक्यता आहे.
श्रावण महिना सुरु झाला की भाजीपाल्याची मागणी नेहमीपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक वाढण्याची गरज आहे. भाजीपाल्याची आवक वाढली तरच त्याचे दर नियंत्रणात येतील, असे मत अनेक व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या आवक कमी असल्याने दर वाढलेले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.