लातूर शहरात दहा दिवसात एकदा पाणी पुरवठा; 1 जानेवारीपासून अंमलबजावणी
लातूर – दुष्काळी लातूर शहरात पाण्याची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे शहराला आता दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी कपातीचं नवीन वेळापत्रक महापालिकेने येत्या 1 जानेवारीपासून लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
गेली वर्षभर लातूर शहराला चार दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. तो पुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून आठ दिवसातून एकदा करण्यात आला. आता त्यापुढे जात जानेवारीपासून दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं लातूर शहरातील लोकांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
मांजरा धरणातला पाणीसाठा जवळपास संपला आहे. जेमतेम असलेला दोन टक्के मृतसाठा आणि मांजरा नदीत साठवण्यात आलेलं पाणी यावर दहा दिवसांचं नियोजन करण्यात आलं आहे. उन्हाळा आणि संभाव्य पाणी टंचाई यामुळं आता दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या हातून पिकं गेली. येत्या एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आतापासूनच जिल्हा प्रशासन टंचाई निवारणाच्या तयारीला लागलं आहे.
लातूरला दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातल्या अनेक गावात आतापासूनच टंचाई सुरुवात झालेली आहे. मात्र पाण्याची गळती आणि चोरी यावर पालिकेने नियंत्रण आणावे आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी लातूरकर करत आहेत.