रेल्वे रुळाला तडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’ विस्कळीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/local-train-1-1-1.jpg)
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी ८ च्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान रुळाला तडे गेले असल्याची माहिती आहे.
परिणामी, कल्याण-कसाऱ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याची माहिती आहे, पण गाड्या अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत असून प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन गर्दीच्यावेळी सुमारे २० ते २५ मिनिटे गाड्या ऐकाच ठिकाणी थांबल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाल्याने दिवा, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवर सतत अशा घटना घडत असल्यामुळे प्रवासीही संताप व्यक्त करत आहे.