राष्ट्रीय महामार्गावर आठ महिन्यांत २६५ ठार
- सर्वाधिक अपघात मुंबई-बंगळुरू महामार्गावर
पुणे : पुणे जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून गेल्या आठ महिन्यात २३७ प्राणांतिक अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेग, नियम धुडकावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे गंभीर स्वरुपांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी व्यक्त केले आहे.
पुणे जिल्ह्य़ात मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे- नाशिक हे तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या तीन राष्ट्रीय महामार्गाची लांबी ३७६ किलोमीटर आहे. महामार्गावर होणारे बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होत आहेत. नियम धुडकावणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे तसेच भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या वाढती असून वेगामुळे बहुतांश अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी २०१८ मध्ये मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक महामार्गावर ५२२ अपघात झाले.त्यापैकी २४२ प्राणांतिक अपघात झाले असून या अपघातात २९२ जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत ४८७ अपघात झाले. त्यापैकी २३७ प्राणांतिक अपघातात २६५ जणांना प्राण गमावावे लागले आहेत, अशी महामार्ग पोलिसांनी दिली. बहुतांश अपघात हे नियमांची पायमल्ली करण्यात आल्याने घडले आहेत. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे.