राममंदिराबाबत कोर्टाकडे बोट दाखवू नका: उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Uddhav-Thackeray-3.jpg)
मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे सांगत राम मंदिराबाबत न्यायालयाकडे बोट दाखवून चालणार नाही. हा विषय कायदा करुनच सोडवावा लागेल, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर येत्या २४ डिसेंबरला पंढरपुरात सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे. यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत. शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
राम मंदिराबाबतही त्यांनी भाष्य केले. मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, असे म्हणत त्यांनी भाजपाला ठणकावले. राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार आहे. राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले.