राज्यात ‘शिवशाहू यात्रा’ काढणार; संभाजीराजेंची घोषणा
![Sambhaji Raje quetioned government over EWS reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Sambhaji-Raje-696x364-1.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
“दक्षिण दिग्विजयला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगावच्या मौनी महाराज मठात आशीर्वाद घेतला होता. असाच आशीर्वाद आपण आज मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी घेतलाय आणि त्यामुळे एक वेगळीच ताकद मिळाली”, असं सांगतानाच समाजात जातीय विषमता वाढत असल्याने आपण लवकरच ‘शिवशाहू यात्रा’ काढून संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव ते आदमापूरपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने आज संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.
“इसीबीसी विषयावर मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली भूमिका ही माझी एकट्याची नाही, तर सकल मराठा समाजाची आहे. दहा टक्के आरक्षण घ्यायचं होतं, तर मग मोर्चे आणि बलिदान कशासाठी दिलं”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजात जातीय विषमता वाढत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवशाहू यात्रा काढण्याचा आपला विचार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथे सकल मराठा समाजकडून संघर्ष यात्रेच आयोजन करण्यात आलं होत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या बाईक रॅलीच उद्घाटन करण्यात आलं. खासदार संभाजीराजे यांनी पाटगाव इथं मैनी महाराजांच्या मठात दर्शन घेत मराठा समाजाला संबोधित केलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली रद्द करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत बाईक रॅली रद्द केली. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी इसीबीसी स्वीकारायला तयार असणारे मराठा समाजाच नुकसान होणार नाही, हे समजाला लिहून देणार आहेत का, असं स्पष्ट सवाल केला. हातात आहे ते देखील सरकार देत नसल्याचा आरोप संभाजीराजेंनी यावेळी केला.