राज्यात पुढील दोन दिवस कोसळणार मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई- गेली दोन आठवडे राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून हवेची लाट आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बाजी मारली आहे. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरल्यात जमा आहेत.
पाऊस चांगला झाल्यास सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात. सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण, यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जोरदारपणे बरसायला सुरूवात केल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला.