राज्यात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
मुंबई – हिवाळा ऋतू आता खऱ्या अर्थाने देशात स्थिरावू लागला आहे. उत्तर भारतात सातत्याने तापमानाचा पारा खाली जात असून दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत याचे परिणाम दिसत आहेत. उत्तरेकडे आलेली ही थंडीची लाट राज्यावरही परिणाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, कोल्हापूर या भागांसह मुंबईतही तापमानाचा आकडा खाली गेला आहे. राज्यात आलेली ही थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर आता थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
वाचा :-भारतामध्ये Covishieldच्या emergency use authorisation साठी SII चा DCGI अर्ज
पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या भागांमध्ये अनेक ठिकाणी शहराकडून जाणारी गर्दी वाढल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचे संकट पाहता या भागांमध्ये शक्य तितकी काळजी घेण्यात येत असू, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
दरम्यान, उत्तरेकडील कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि त्तराखंडमधील काही उंच प्रदेशांवर बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुण्यात 11.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून महाबळेश्वरमध्ये 14.3 अंश सेल्शिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे.