breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात आरोग्य विभागातील 17 हजार जागा मेरीटनुसार भरल्या जाणार; तर कोरोना लढ्यातील खासगी डॉक्‍टरांना 50 लाखांचे विमा कवच

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्यानं आरोग्य विभागातील १७ हजार जागा मेरीटनुसार भरल्या जाणार आहेत. याची प्रक्रिया तातडीने येणा-या आठवड्यात सुरू होणार आहे. याशिवाय कोरोना लढ्यातील खासगी डॉक्‍टरांनाही ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते सोमवारी इस्लामपूर येथे टाटा ट्रस्टच्या वतीने सुरू केलेल्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

इस्लामपूरमध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अद्ययावत उपचारासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने सुसज्ज रुग्णालय उभे करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी सांगली जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. यातून उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोव्हिड उपचार रुग्णालय तयार केले आहे. अवघ्या चार महिन्यात उभ्या केलेल्या रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. यावेळी बोलतांना मंत्री टोपे म्हणाले, ‘राज्यासह देशाच्या विकासात टाटा ट्रस्टचे महत्त्वाचे योगदान आहे. कोरोना संसर्गाच्या काळात टाटा ट्रस्टने वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट यासह रुग्णालयांच्या उभारणीतही महत्त्वाचे काम केले. हे काम दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील. दिवसेंदिवस कोरेनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीने या विभागातील १७ हजार जागा मेरीटनुसार भरल्या जाणार आहेत. येणाऱ्या आठवड्यापासूनच याची प्रक्रिया सुरू होईल, असं ते म्हणाले

‘कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोरोना लढ्यात दगावणाऱ्या खासगी डॉक्टरांसाठी ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे यावे.’ असंही ते म्हणाले. रुग्णालय लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील होते. रुग्णालयासाठी निधी दिल्याबद्दल त्यांनी टाटा ट्रस्टचे आभार मानले. तसेच या रुग्णालयामुळे इस्लामपूरसह जिल्ह्यातील करोनाबाधितांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, जिल्‍हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button