राज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले!
![38.18 per cent schools from 8th to 12th standard started in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/School-Opinging-in-Maharashtra.jpg)
पुणे । प्रतिनिधी
सुमारे 10 महिन्यांनंतर मुंबई वगळता संपूर्ण राज्यात 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. सकाळपासूनच पुण्यासह राज्यातील अनेक भागात शाळेच्या बाहेर गर्दी दिसून आली. दरम्यान केवळ मास्क घातलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जात आहे. अनेक शाळांनी स्वतःहून विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था केली आहे. शाळांनी शिक्षकांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
यादरम्यान राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा सरकार विचार करेल. मुंबईत बीएमसीने पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील ग्रामीण भागात आजपासून शाळा सुरू होणार आहेत.
मास्क घालूनच मुलांना पाठवण्याचे आवाहन
शिक्षण मंत्री म्हणाल्या की, शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना मास्क घालूनच शाळेत पाठवावे असे आवाहन करतो. एकदा आपण त्यात यशस्वी झालो की, त्यानंतर आम्ही चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार करू.
राज्यात 5वी ते 8 वी इयत्तेत 78.47 लाख विद्यार्थी
शिक्षण विभागाच्या एका निवेदनानुसार, “सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी राज्यातील 22,204 शाळांतील इयत्तेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 27 जानेवारीपासून इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करत आहोत. राज्यात 5 वी ते 8 वी इयत्तेत 78.47 लाख विद्यार्थी आहेत.
बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून तर 10 वी बोर्ड परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहेत.