राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई: राज्यात दोन दिवस पावसानं उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं सांगण्यात आलेलं आहे.
4 ते 6 ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पवासामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्यानं स्थिती पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. आता पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट विदर्भ आणि कोकणांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.