राज्यातील प्राध्यापकांना तब्बल ७ वर्षांनी मिळणार संप काळातील वेतन
मुंबई – राज्यातील प्राध्यापकांना तब्बल सात वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्राध्यापकांचे दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३ ते दिनांक १० मे, २०१३ या ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील १२५१५ प्राध्यापकांना होणार असून एकूण ₹ १९१.८१ कोटी थकीत वेतन त्यांना मिळणार आहे’, असे ट्विट सामंत यांनी केले आहे.
वाचा :-भारत बंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा- शिवसेना खासदार संजय राऊत
दरम्यान, राज्यातील प्राध्यापकांनी वेतन वाढ आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी ४ फेब्रुवारी २०१३ पासून बेमुदत संप सुरू केला होता. यानंतर 10 मे 2013 रोजी सरकार आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने हा संप तसाच सुरू होता. या संपानंतर राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर प्राध्यापक संघटनांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेविरोधात उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही प्राध्यापकांच्या बाजूने निकाल लागला. यामध्ये प्राध्यापकांना त्यांचा ७१ दिवसांचा पगार द्यावा. तसेच या रकमेवर ८ टक्के व्याज द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार प्राध्यापकांना संप काळातील ७१ दिवसाचा पगार दिला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.