राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-58.png)
राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात जर कालचा म्हणजे रविवारचा आकडा पाहिला तर, रविवारी एका दिवसात आणखी २२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
रविवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुण्यातील ३, नवी मुंबईतील २ आणि सोलापूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये १३ पुरुष तर ९ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृतांचा आकडा १४९ झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यापैकी अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.