मोदींची निवडणुकीपुर्वींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो : धनंजय मुंडे
विक्रमगड – पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मला मोदींची भाषणं ऐकली की गजनी चित्रपटातील अभिनेता आमिर खानच्या भूमिकेची आठवण येते अशी खरमरीत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील जाहीर सभा विक्रमगड येथे झाली, त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.
‘नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमिर खानची आठवण येते. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. अहो, इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल’, असा टोला मुंडे यांनी लगावला. ‘मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच २०१४ सालची भाषणं ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाही. २०१४ सालच्या लाटेत देशाचं, राज्याचं प्रचंड नुकसान झालंय. मात्र आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही’, असंही मुंडे म्हणाले.
नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमीर खानची आठवण येते. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. अहो, इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल.#परिवर्तनयात्रा #विक्रमगड pic.twitter.com/jvM7TyBGHX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 13, 2019
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या समारोपाप्रसंगी मोदी यांनी आम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन दिले याचा गर्व आहे असं म्हटलं होतं, त्यावरुन समाचार घेताना मुंडे यांनी जर भ्रष्टाचार मुक्त शासन दिलं तर मग व्यापम, ललित गेट, राफेल काय आहे? असा सवाल केला. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी तर जनतेला कोट्यावधी रुपयांनी लुटले. हे तर तुमचं भ्रष्टाचार युक्त शासन. अशी टीका केली.