मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे
![1 lakh 72 thousand 490 students attended school in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/school-1.gif)
मुंबई – कोरोनामुळे गेले अनेक महिने बंद असणाऱ्या शाळा उद्यापासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोना वाढण्याची भीती असल्यानं काही शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत “शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात,” असं स्पष्ट केलं आहे.
राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उद्यापासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरू होत असून, शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली. “सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जर एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितलेलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल,” अशी माहिती तनपुरे यांनी दिली आहे.