“मुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:साठी एक नोकरी घ्यावी”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई – कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. गेल्या सहा- सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग- व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं आहे. देशविदेशातील १५ मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल,” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देश-विदेशातील १५ कंपन्यांमार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासमवेत (एमआयडीसी) ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये जपानमधील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनी ४९० कोटींची तर स्पेनची मंत्रा डेटा सेंटर्स ११२९ कोटींची गुंतवणूक करणार असून, इंग्लंडची कोल्ट कंपनी चार हजार ४०० कोटींची गुंतवणूक करून भव्य डेटा सेंटर्स उभारणार आहे. सिंगापूरचा प्रिस्टन डिजिटल उद्योगसमूह १५०० कोटींची तर इएसआर इंडिया कंपनी चार हजार ३१० कोटींची गुंतवणूक लॉजिस्टीक क्षेत्रात करणार आहे. याशिवाय देशातील काही महत्वाच्या कं पन्या डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत. यातील बहुतांश उद्योग चाकण -पुणे, रायगड तसेच नवी मुंबई आणि मुंबईत उभे राहणार आहेत.