मुक्त शिक्षण मंडळ गुरुवारपासून कार्यरत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/edu.jpg)
- अपंग, विशेष प्राविण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही शालेय परीक्षा देता येणार
मुंबई – राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर सुरू होणारे राज्याचे मुक्त शिक्षण मंडळ १० जानेवारीपासून कार्यरत होणार असून विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही पाचवी, आठवी, दहावीची परीक्षा देता येणार आहे. हे मंडळ १० जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाप्रमाणे राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात आले असून, राज्यमंडळाच्या अख्यत्यारित हे मंडळ कार्यरत असणार आहे. शारीरिक व्यंग, अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी, कला किंवा क्रीडा क्षेत्रातच पुढील शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते.
गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेले हे मंडळ १० जानेवारीपासून कार्यरत होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत सातत्यपूर्ण आणि र्सवकष मूल्यमापन पद्धती अवलंबणे अपेक्षित होते. मात्र त्यामुळे मुक्त शिक्षण मंडळाअंतर्गत पाचवी आणि आठवीच्या टप्प्यांवर परीक्षा घ्याव्यात का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शिक्षण हक्क कायद्यातील सुधारणेनंतर राज्याच्या मुक्त शिक्षण मंडळाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता हे मंडळ सुरू होत आहे.
मुक्त विद्यालयात नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य देण्यात येणार आहे. ज्या टप्प्याची परीक्षा विद्यार्थी देणार असेल त्या टप्प्यापर्यंत येणे आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा आढावा घेणारी पुस्तके, सराव संच देण्यात येतील. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तके देण्यात येणार आहेत.
नियमित विद्यार्थी म्हणून नोंद
’ दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, १३ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि १५ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतात.
’ १४ वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येणार आहे.
’ मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांशी समकक्ष असणार आहेत.
’ दहावीसाठी दोन भाषा आणि गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, व्यवसाय शिक्षण, कला यांपैकी कोणतेही तीन विषय परीक्षेसाठी निवडता येणार आहेत.
’ आठवीसाठी दोन भाषा, गणित बंधनकारक असेल तर विज्ञान, समाजशास्त्रे, कला, व्यवसाय शिक्षण यापैकी दोन विषय निवडता येतील.
’ पाचवीच्या परीक्षेसाठी दोन भाषा, गणित, परिसर अभ्यास हे विषय बंधनकारक असून चित्रकला, संगीत, नाटय़ यापैकी एक विषय निवडता येईल.