मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झालीये.
तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी, काजळी नदी, अर्जुना नदी यांना पूर आल्यानं आता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.