मुंबईसह कोकणात 12 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईसह ठाणे उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे शनिवारी सकाळी मुंबईहून सुटलेली पहिली कसारा लोकल कुर्ल्या स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतरच्या खोपोलीपासून सर्व गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईसह उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या भागात मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर, ठाण्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यातील रेल्वे स्थानकातील रुळ पाण्याखाली गेला आहे.
दरम्यान, अखेर मान्सून शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणासह दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांत झालेला पाऊस हा मान्सूनच असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.