मुंडे गेले, देशमुख गेले, चव्हाण हारले; मराठवाड्याच्या पालकत्वाचा प्रश्न गंभीरच…
एकेकाळी राजकारणामध्ये चांगले काम करण्यासाठी वरचढ असणारे आणि मराठवाड्याचा झेंडा सर्व ठिकाणी फडकवणाऱ्या तीन नेत्यांची आठवण आज मराठवाड्याचा दुष्काळ पाहून होत आहे. या तीन नेत्यांमध्ये गोपिनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख हे दोघेजण आता आपल्यात हयात नाहीत आणि तीसरे अशोक चव्हाण यांची आता आपल्याच मतदार संघात पत उरली नाही, त्यामुळे आता मराठवाड्याचे पालकत्व कोण स्विकारणार हा प्रश्न मराठवाडावासीय विचारू लागले आहेत.
मराठवाड्यातला दहा वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर मुंडे, देशमुख आणि चव्हाण या तीन्ही नेत्यांनी आपल्या भागात विकासासाठी चढाओढ केली. येवढेच नाहीतर राज्यात आणि देशात या तिन्ही नेत्यांचा दबदबा होता. गोपिनाथ मुंडे कधी केंद्रात, तर कधी राज्यात भाजपाचे नेतृत्व करायचे. विलासराव आणि अशोकराव यांनी कधी राज्यात तर कधी केंद्रात कॉंग्रेसचे नेतृत्व केलं. त्या नेतृत्वामध्ये हे तिघेजण आपल्या कर्मभूमीला कधी विसरले नाहीत. या तिघानींही मराठवाड्यासाठी केलेलं काम मराठवाड्याच्या इतिहासात नक्कीच नोंद घेण्यासारखं आहे. मुंडे यांच्या जाण्यानंतर पंकजा आणि प्रितम मुंडे या दोघींनी राज्यात आणि केंद्रात आपली राजकिय छबी कायम ठेवली. कार्यकर्त्यांमध्ये आजही गोपिनाथ मुंडे यांचे पालकत्व कमी झाले म्हणुन फारशी उणीव भासत नाही, त्याचे कारण या दोन्ही बहिणी आपल्या वडीलांच्या पायावर पाऊस टाकत पुढे जात आहेत. लातूरमध्ये विलासरावांचे सुपूत्र आमदार अमित देशमुख यांनी विलासरावांच्या पावलांवर पाऊल टाकत आपली वेगळी छबी निर्णाण करण्याचा प्रयत्न केला, त्याला फारसे यश आले नाही. मुंडे आणि देशमुख यांच्या वारसांना आपला जिल्हा सोडून आपल्या वडिलांसारखं बाहेर काम करणं फार जमलं नाही. तिकडे नांदेडमधल्या राजकारणात अशोक चव्हाणांना गुंतवून ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले. केंद्र, राज्य आणि मराठवाडा येथेतर सोडाच; पण आपल्या मतदार संघातही अशोक चव्हाण या निवडणूकीत न्याय देऊ शकले नाहीत. मतदारांनी त्यांना नाकारलं आणि मराठवाड्यात असलेलं तिसरं नेतृत्वही राजकारणातून बाजूला फेकलं गेलं.
मराठवाड्यात अशोकराव चव्हाणांनंतर नेता कोण? आणि तो इथली असंख्य असणारे प्रश्न सोडवणार का? हा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चीला जाऊ लागला आहे. सध्या दुष्काळामुळे विलासराव आणि गोपिनाथ मुंडे या दोघांची सगळ्यांना आठवण येते.