महाविद्यालयाच्या रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्यानं रुग्णांचे हाल…
जळगावपासून १८ किलोमीटरवर असलेल्या गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. यामुळे अनेक रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलवावं लागलं. करोना रुग्णांसाठी या रूग्णालयातील ४०० खाटा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. परंतु, कोविड कक्षात पाणी शिरलं नसून रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पाणी शिरून नुकसान झाल्याचं महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं….
शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. महाविद्यालयाबाहेर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी थेट महाविद्यालयात शिरलं. रुग्णालयात पाणी शिरल्याने विषबाधा झालेले, अपघातात जखमी झालेल्या अशा सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलवावं लागलं.
दरम्यान, या प्रकरणाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली असून अधिष्ठात्यांना रुग्णालयाची पाहणी करण्यास सांगितलं आहे. एवढे मोठे वैद्यकीय महाविद्यालय असल्याने त्यांच्या प्रशासनाची काही जबाबदारी आहे. वेळ पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पाठवावी, असेही पाटील यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. उल्हास पाटील यांनी करोना नव्हे, तर आपत्कालीन कक्षात पाणी शिरले असल्याचं स्पष्ट केलं आहे…रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पाणी शिरल्याने ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. करोना कक्ष आपत्कालीन विभागाटं काहीही नुकसान झालेलं नाही.