महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी – चंद्रकांत पाटील
अमरावती – “राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक पॅकेजेस जाहीर केले. पण राज्य सरकारने कुठलंही पॅकेज दिलं नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
“कोरोना काळात केंद्र सरकारने अनेक पॅकेज दिले. पण राज्य सरकारने या काळात कुठलंही पॅकेज दिलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार कोरोनापासून ते सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. कोरोनाकाळात जे विद्यार्थी पदवी घेतील, त्यांच्या उल्लेख कोरोनाकाळातील पदवी असा होईल. राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.”
पत्रकार आज सुपात, उद्या जात्यात ?
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवर भाष्य केले. राज्यात सामाजिक अस्थिरता आणि दंडुकेशाही सुरु असल्याचं ते म्हणाले. तसेच, पत्रकार आज सुपात आहेत; उद्या जात्यात असतील असं म्हणत त्यांनी राज्य सरकार तसेच पोलिसांवर टीका केली. शिवसेनच्या मुखपत्रात झालेल्या टीकेवर बोलताना आम्ही या टीकेला गंभीरपणे घेत नाही असे म्हणत ते मुखपत्र कोण वाचतं असा सवाल त्यांनी केला.