महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चे सरकार
मुंबई:- हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन गेली ५० वर्षं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचे संख्याबळ ११८ पर्यंत गेले. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ – अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेने लावून धरली. अखेर, आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचे भाजपाने रविवारी संध्याकाळी राज्यपालांना कळवले.
शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे.