मराठवाडा आणि विदर्भाला झोडपले वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशामध्ये आता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आस्मानी संकटामुळे चिंतेत आले आहेत. मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती यवतमाळ, जळगाव, वर्धा आणि धुळे या जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. बोरांच्या आकाराच्या गारा काही भागांमध्ये पडल्या. त्यामुळे आंबा, द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत गहू, हरभरा, मका, कापूस, कांदा यांच्यासह रब्बी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदील झाला आहे.
विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे धुळ्यातील काही भागांमध्ये झाडं कोसळली. त्याचबरोबर अमरावती आणि धुळ्यातील काही भागांमध्ये वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. आधीच कोरोना विषाणूमुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि आता आस्मानी संकटाने शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.