मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Raj-Thackery-1.jpg)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम विरोधात मनसे आंदोलन करणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही भेट राज ठाकरे घेणार आहेत असंही समजतं आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही राज ठाकरे भेटणार आहेत. ईव्हीएम घालवा आणि बॅलेट पेपर परत आणा ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. ९ ऑगस्टला ते ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केलेली दिसते आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आणखी काय चर्चा झाली? ते समजू शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न अद्याप कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली का? ते समजू शकलेले नाही.