‘मनरेगा’ म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना
पुणे : महात्मा गांधींनी खेड्यांच्या स्वावलंबनावर भर दिला होता. परंतु खेड्यांना स्वावलंबनाकडे नेण्याऐवजी मनरेगासारख्या शासकीय योजनांद्वारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविली जात आहे. मनरेगा योजनेचे वर्णनच करावयाचे झाल्यास ‘भिकारी तयार करण्याचा कारखाना’ एवढीच ती होऊ शकेल,’ अशी टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या दिवशी गांधी बोलत होते. ‘सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
गांधी म्हणाले, ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण सक्षमीकरणाऐवजी त्यांना ऐतखाऊ आणि आळशी बनविले जात आहे. त्यांच्या पंखांना ताकद देण्याएवजी त्यांना लाचार केले जात आहे. आज अनेक एकरांत जमीन असलेले शेतकरी, सुशिक्षित तरुणदेखील ‘मनरेगा’ आणि इतर सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या मानधनात समाधान मानत आहेत.