मजुरांचा आक्रोश, अन् विद्यार्थ्यांची तत्परतेने मदत
पुणे : आंबेगाव भागात मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक वीज पडल्यासारखा आवाज झाला. सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या आवारातील वसतिगृहातील विद्यार्थी रात्री साडेअकराच्या सुमारास जागे होते. काही कळायच्या आत मजुरांचा आक्रोश सुरू झाला. किंकाळ्या, मदतीची याचना करणाऱ्या मजुरांचा आवाज ऐकून क्षणाचा विलंब न लावता विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) घटनास्थळी पोहचेपर्यंत विद्यार्थ्यांनी मदतकार्यात झोकून दिले.
कात्रज भागातील आंबेगाव परिसरात असलेल्या सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या आवारापासून काही अंतरावर सोमवारी रात्री सीमाभिंत कोसळली. या दुर्घटनेत सहा मजूर मृत्युमुखी पडले तसेच चार जण जखमी झाले. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या आवारातील विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मदतकार्य केले. त्यांच्या मदतकार्यामुळे जखमींना मदतीचा हात मिळाला. गोविंद महाडीक, सिद्धार्थ म्हसे, अमोल हरसुले, विशाल पारखी, आदित्य हिंगे तसेच रखवालदार विमा हरनोर यांनी मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महाडीक, म्हसे, हरसुले तिघे संगणक विषयक अभ्यासक्रम करत आहेत. हिंगे अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक्रम करत असून पारखी वाणिज्य शाखेत आहे. महाडीक, म्हसे, हरसुले तिघे जण मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूरचे आहेत. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिघे जण वसतिगृहातील खोलीत होते. दुर्घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, सोमवारी रात्री आंबेगाव भागात मुसळधार पाऊस सुरू होता. अचानक वीज कोसळल्यासारखा आवाज झाला. बाहेर डोकावून पाहिले, तर मजुरांच्या तात्पुरत्या घरांवर भिंत तसेच झाड कोसळल्याचे निदर्शनास आले. मजुरांचा आक्रोश तसेच किंकाळ्या ऐकू आल्यानंतर आम्ही तातडीने तेथे धाव घेतली.
या भागातील एका इमारतीतील रखवालदार हरनोर तेथे आला. दरम्यान, विद्यार्थी वसतिगृहातील आणखी काही विद्यार्थ्यांनी तेथे धाव घेतली. मोबाइलमधील बॅटरीचा प्रकाशझोत राडारोडय़ावर मारला. तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या घरांचे पत्रे तसेच राडारोडय़ाखाली मजूर अडकले होते. तातडीने राडारोडय़ा खाली दबलेल्या चार मजुरांना आम्ही बाहेर काढले, असे त्यांनी सांगितले.
सख्खे भाऊ गमावले
आंबेगाव भागात सीमाभिंत कोसळून प्रल्हाद रावते आणि जितेंद्र रावते या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. त्यांचा मोठा भाऊ अरुण आणि बहीण मीना हे मजुरी करतात. काही कामानिमित्त ते मध्य प्रदेशातील मूळगावी गेले होते. मंगळवारी सकाळी अरुण पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. तेव्हा त्यांना सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रल्हाद आणि जितेंद्र यांचा मृत्यू झाल्याची घटना समजली. गावी गेल्याने मी बचावलो पण सख्खे भाऊ गमावले, असे अरुण रावते याने सांगितले. रावते कुटुंबीय गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पुण्यात मजुरी करतात.
धोकादायक ठिकाणी आता पोलिसांची गस्त
कात्रज परिसरात डोंगर उतारांवर बांधकामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात अशा बांधकामांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागात आता पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार असून धोकादायक बांधकामांची माहिती महापालिका प्रशासन तसेच संबंधित यंत्रणेला देण्यात येणार आहे, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले.