मंदिरं, जिम, रेस्टॉरंटबाबत या आठवड्यात निर्णय घेणार-परिवहनमंत्री अनिल परब
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil_Parab.jpg)
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आजपासून (१ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या ‘अनलॉक ४’ करिता केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर राज्य सरकारने देखील सोमवारी (३१ ऑगस्ट) नियमावली जारी केली आहे. राज्याच्या या नियमावलीनुसार, धार्मिक स्थळे, मंदिरे, जिम, रेस्टॉरंटवर असलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, या ८ दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. दरम्यान, सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेत जिल्हाबंदी हटविण्यात आली आहे. आता राज्यात जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची अट नसेल.
“राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेण्यावर या आठवड्यात विचार सुरु होईल. जिम आणि हॉटेल्समध्येफरक आहे. हॉटेल्स लॉज सुरु केली तरी ती १०० टक्के भरतीलच असं नाही. मात्र, जिममध्ये लोकांना येणारा घाम, वेगाने होणारा श्वासोच्छवास या सर्व गोष्टी लक्षात घेता कोरोना संसर्ग टाळता येऊन जिम कशा सुरु कराव्यात याबाबत निर्णय घेतला जाईल”, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. तर, रेल्वेबाबतचा निर्णय आधी केंद्र सरकार घेईल. मग राज्य सरकार घेईल. मुंबईत ट्रेनमध्ये गर्दी होते. त्यामुळे विचार करुनच मग निर्णय होईल”, असेही त्यांनी सांगितले.
“गेले कित्येक दिवस राज्यातील ई-पास रद्द करण्याची मागणी होत होती. एसटीमध्ये ई-पास रद्द केला असला तरीही एसटीतून कोण कुठे जातंय याची नोंद करता येत होती. खाजगी वाहनातून जाणाऱ्या प्रवाशांची तशी नोंद होऊ शकत नव्हती. त्यामुळे, आम्ही खाजगी वाहनांना ई-पास कायम ठेवला होता. मात्र, महाराष्ट्रातील परिस्थिती आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. अर्थचक्र सुरळीत करण्याच्या दृष्टीने लोकांची जिल्ह्यांतर्गत वाहतूक महत्वाची आहे. त्यामुळे, आम्ही ई पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही अनिल परब यावेळी म्हणाले