breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजपमध्ये उद्या ‘महाभरती’!

भाजपमध्ये बुधवारी ‘महाभरती’ची लाट येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील १०-१५ वर्षे भवितव्य दिसत नसल्याने या पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. त्यांनी नावे जाहीर केली नसली तरी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजनादेश यात्रा’ १ ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यतील मोझरी येथून निघणार आहे. या यात्रेबाबत माहिती देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्ष सोडून भाजपमध्ये का येत आहेत, याचे आत्मपरीक्षण शरद पवार यांनी करावे. त्यांनीच या नेत्यांना मोठे केले आहे. भाजप हाच जनतेसाठी काम करणारा संवेदनशील पक्ष असल्याने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य राहिलेले नसल्याने हे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. कोणालाही चौकशीची भीती दाखविलेली नाही.’

पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम बुधवारी सीसीआय क्लबमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत असले तरी भाजप स्वबळाची तयारी करीत आहे, असा याचा अर्थ नाही. शिवसेनेशी जागावाटपाची चर्चा सुरू असून कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. युती म्हणूनच निवडणुका लढवू, असा पाटील यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देणे आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मतदारांचे आभार मानणे, हे या यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले. या यात्रेच्या ‘लोगो’चे अनावरण पाटील यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात केले. यात्रेसाठीच्या रथाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तो मोझरी येथे रवाना होईल.

कोळंबकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. माजी मंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कोळंबकर भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

भाजपकडून यंत्रणेचा गैरवापर : जयंत पाटील

राष्ट्रवादीमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणाचा गैरवापर करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. भाजपने दुसऱ्या पक्षांमध्ये फूट पाडण्यापेक्षा लोकांची कामे केली असती तर, ते योग्य झाले असते. अन्य पक्षांतील नेत्यांची त्यांना गरज वाटत आहे, याचा अर्थ भाजप किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होते, असा टोला पाटील यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button