भाजपचे 2022 पर्यंत संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न ! -धनंजय मुंडे
औरंगाबाद- डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे. असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. आज औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे संविधान बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान ते बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी होतेय. संविधानाने दिलेला बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. म्हणून संविधान वाचवण्यासाठी आज धडपड करावी लागत आहे.
ज्या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, तेच आज संकटात आहे. १९५० साली अस्तित्वात आल्यापासून संविधान वाचवण्याची भाषा देशात कधीही झाली नव्हती, मात्र आजच्या राज्यकर्त्यांमुळे संविधान वाचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे. या देशातील जनताच लोकशाही वाचवेल, मतदानाचा मोठा हक्क जनतेच्या हातात आहे. त्यांनी त्याचा योग्य वापर करून या सरकारला धडा शिकवावा.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फोजिया खान, आ. राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रकाश गजभिये, विजय भाम्बळे, सौ. चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, कदिर मौलाना आदी उपस्थित होते.