‘भाजपचा क्लीन बोल्ड झालाय’, नवाब मलिकांचा गडकरींना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Nitin-Gadkari-Nawab-Malik.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्यात सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे क्रिकेटप्रमाणे असून यात कधीही काहीही होऊ शकतं असं विधान केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप क्लीन बोल्ड झालाय हे स्वीकारा म्हणत गडकरींना टोला लगावला आहे.
नवाब मलिक म्हणाले, “गडकरी क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे सांगत आहेत. या शक्यतेला आम्हीही नाकारत नाही. मात्र, क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू क्लीन बोल्ड होतो, तसंच भाजपला जनतेने क्लीन बोल्ड केलं आहे. हे त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे.”
मलिक यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार भाजपचंच येणार या दाव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, “फडणवीस त्यांच्याकडं 105 आमदार असल्याचं आणि 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत आहेत. मग राज्यपालांकडे त्यांनी सरकार बनवू शकत नाही हे का सांगितलं? सरकार बनवण्यासाठी 145 आमदार लागतात. 145 आमदारांशिवाय कोणतंही सरकार स्थापन होणार नाही.”