बापरे ! पाणीपुरीसाठी सडलेल्या बटाट्यांचा वापर…
पाणीपुरी म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. सायंकाळी तर पाणीपुरीच्या गाडीवर अक्षरश: गर्दी उसळते. मात्र, पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पदार्थ खरेच चांगले आहेत, याची कुणी कधी पडताळणी करीत नाही. तसेच एफडीएकडून शहरात खाद्यपदार्थांच्या दर्जाची नियमित तपासणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण अस्वच्छतेबरोबरच पाणीपुरीसाठी सडलेल्या बटाट्यांचा वापर करण्यात अल्याचं उघड झालं…आणि अशाच एका पाणीपुरी विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा माल बुधवारी (दि. ६) सातपूर भागात महापालिकेच्या पथकाकडून नष्ट करण्यात आला.
महापालिकेच्या सातपूर विभागातील घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत बजरंगनगर मळे परिसरात पाहणी दौरा सुरू होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पाणी पुरीकरता लागणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळून आले. यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी माधुरी तांबे यांनी निकृष्ट असलेले खाद्यपदार्थ नष्ट केले. सडलेले बटाटे व चटणीसाठी टाकण्यात येणारे कलर जप्त केले. तसेच ज्या ठिकाणी पाणीपुरीला लागणारे खाद्यपदार्थ बनविले जात होते, त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार पाणीपुरीवाले करीत असल्याचा आरोप मनपा अधिकाऱ्यांनी केला. यामुळे तुम्ही पाणी पुरी खाताय, पण जरा जपून असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.