प्लॅस्टिक बंदीचा परिणाम…15000 कोटीचे उत्पन्न आणि 3 लाख नोकऱ्या जाणार !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/plastic-ban-3.jpg)
मुंबई – महाराष्ट्रातील प्लॅस्टिक बंदीचा परिणाम…व्यवसायाचे 15000कोटीचे उत्पन्न बुडणार आणि 3 लाख जण बेरोजगार होणार. महाराष्ट्रात शनिवारपासून पूर्ण स्वरूपात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन आणि वापर यावर ही बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे इतर परिणाम काहीही असले, प्लॅस्टिक व्यवसायावर आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांवर होणारा परिणाम या दुसऱ्या बाजूचा विचार करायला हरकत नाही. प्लॅस्टिक वापरावरील बंदीमुळे प्लॅस्टिक उद्योगाचे सुमारे 15,000 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे आणि प्लॅस्टिक उद्योगावर अवलंबून असलेल्या सुमारे 3 लाख लोकांवर रातोरात बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती पीबीएमए (प्लॅस्टिक बॅग्ज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) चे जनरल सेक्रेटरी नीमित पुनामिया यांनी दिली आहे.
प्लॅस्टिक बंदी लागू केल्यानंतर व्यवसाय बंद करण्यवासून दुसरा काहीही मार्ग नसल्याने सुमारे 2500 सदस्यांनी असोसिएशनचे सदस्यत्व सोडल्याचे नीमित पुनामिया यांनी सांगितले. प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या वापरावर घालण्यात आलेली ही बंदी भेदभावयुक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्लॅस्टिक वस्तूंच्या वापरावरील बंदीचा आदेश 23 मार्च रोजी काढण्यात आला होता. याद्वारे प्लॅस्टिक वस्तूंची निर्मिती, वापर, विक्री, वितरण आणि साठा करणे यावर बंदी घालण्यात आली. बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एकदाच वापर करण्याच्या प्लॅस्टिक पिशव्या, चमचे, प्लेटस, पेट (पीईटी) आणि पेट (पीईटीई) बॉटल्स आणि थर्मोकोलचे साहित्य यांचा समावेश आहे. अस्तित्वात असलेल्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी शनिवार दिनांक 23 जून रोजी संपला.
प्लॅस्टिकवरील बंदीमुळे लाखोंच्या नोकऱ्या जाऊन बेकारी वाढणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जीडीपीवर होणार असल्याचे आणि बॅंकांच्या बुडित कर्जात वाढ होणार असल्याचे उद्योगातील लोकांचे म्हणणे आहे. बंदीच्या आणि अवास्तव दंडाच्या भीतीने ग्राहकांना नकार द्यावा लागत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. उलट प्लॅस्टिकवरील बंदीमुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. अनेक बाबतीत प्लॅस्टिकच्या वापराला पर्यायच नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून या बंदी घालण्यात कोणत सूज्ञपणा आहे? असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहत आहे. प्लॅस्टिक वापरावरील बंदी मोडणारास पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अपराधास अनुक्रमे रु.5,000, सु. 10, हजार आणि 3 महिन्यांच्या कारावासासह 15, 000 रुपये दंडाची तरतूद आहे.