”प्रभू रामचंद्रा”च्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची युती होईल
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत
जळगांव – शिवसेना-भारतीय जनता पक्ष आज कितीही एकमेकांच्या विरोधात भांडत असले, तरी येत्या लोकसभा निवडणुकीत “प्रभू रामचंद्र’ यांच्या मंदिराच्या मुद्यावर त्यांचे एकमत होऊन “युती’ होईल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
निर्धार परिवर्तन’ यात्रेनिमित्ताने ते जळगावात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आज जरी दोन्ही पक्ष भांडत असले, तरी येत्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल. राम मंदिराच्या मुद्यावर दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि युती झाल्याचे जाहीर करतील. राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेस व कॉंग्रेसची आघाडी झालेली आहे, मतांचे विभाजन टाळण्यासाठी इतर समविचारी पक्षांनाही आम्ही सोबत घेत आहोत.
रेशन दुकानादारांसंबंधित प्रकरणात राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यांचा तुम्ही राजीनामा मागणार काय, या विषयावर बोलताना पवार म्हणाले, की बापटांचा राजीनामा ते घेणारच नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे मागणी करूनही फायदा होणार नाही. अगदी राज्यातील 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरही मुख्यमंत्र्यांवर कारवाई केलेली नाही. उलट त्यांना क्लीन चिट मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, आघाडीत जागावाटप अंतिम झालेले नाही, असे सांगून ते म्हणाले, की पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा कायम आहे. याशिवाय रत्नागिरी, औरंगाबाद, जालना या मतदारसंघांबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.