पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा ‘तो’ पुतळा हटवल्यापासून अजित पवार ‘टार्गेट’- जितेंद्र आव्हाड
- राज्यातील एका वर्गाकडून पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचा डाव
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पुणे येथील लाल महाला परिसरातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यापासून राज्यातील एका वर्गाकडून (ब्राह्मण) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हेतुपुरस्सर ‘टागेट’ केले जात आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने राज्य शिखर बँकेतील अनियमितता प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसह अनेकांवर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त राज्यात चर्चेत होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक विधान केले आहे. आव्हाड म्हाणाले की, पुण्यातील लाल महाल आवारात असलेला दादाजो कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यापासून राज्यातील एका वर्गाकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. प्रत्येक तीन महिन्याला हेतुपरस्सर नवीन आरोप केले जातात. त्यामुळे उद्वीघ्न होवून अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला जात आहे. मात्र, तरीही काही लोक याला कौटुंबिक वाद असल्याचा गवगवा करीत आहेत. परंतु, पवार कुटुंब हे अभेद्य किल्ला आहे. त्यांच्यामध्ये कसलाही मतभेद नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
काय आहे दादोजो कोंडदेव पुतळा प्रकरण?
दि.२६ डिसेंबर २०१० रोजी पुण्यातील लाल महाल आवारातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. पुणे महापालिकेने हा पुतळा हटवण्याचा ठराव मंजूर करत ही कारवाई झाली होती. पुणे महापालिकेचे तत्कालीन महापौर मोहनसिंग राजपाल (राष्ट्रवादी) यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. याबाबतचा ठराव पुणे महापालिकेत मांडला तेव्हा सेना, भाजप आणि मनसे या तीनही पक्षांनी विरोध केला होता. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला होता. वादग्रस्त लेखक जेम्स लेन याने ‘Shivaji – The Hindu King in Islamic India’ या पुस्तकाच्या माध्यमातून जे लिखाण केले. ते निराधार आणि ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे होते, असे जाणकारांचे मत आहे. यावरुन निर्माण झालेल्या वादाला महाराष्ट्रातल्या जातीच्या राजकारणाचीही जोड मिळाली. जेम्स लेन यांच्या पुस्तकातील संबंधित उल्लेखानंतर हे पुस्तक देशात प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली. त्या आधी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का? यावरूनही वाद झाला होता. जेम्स लेन प्रकरणानंतर ही जागा दादोजी कोंडदेव यांनी घेतली. या प्रकरणी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तोडफोड करण्यात आली होती. यात आरोपी असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांची २०१७ साली निर्दोष मुक्तता झाली आहे. दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. या मागणीला शिवसेना, त्या वेळी नव्याने सुरू झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांनी विरोध केला होता. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात भूमिका घेतली. बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. दरम्यान, पुण्यात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने दादोजींच्या प्रतिमेचे पुणे महापालिकेसमोर पूजन केले होते. त्यामुळे या प्रकरणाला जातीय वादाची किनार मिळाली होती.