पाहूणा निघाला चोरटा, त्याने मारला साडेसात तोळ्यावर डल्ला
औरंगाबाद – कामाच्या बहाण्याने औरंगाबादेतील नातेवाइकांकडे आला. मुक्कामही केला; पण जाताना साडेसात तोळे सोन्याचे दागिने घेऊन गेला. हा प्रकार उघड होताच गुन्ह्याची नोंद झाली आणि पोलिसांनी श्रीरामपूर गाठून चोरी करणाऱ्या पाहुण्याला संशयावरून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली.
मकरंद आहेर (रा. श्रीरामपूर, जि. नगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जवाहरनगर भागात पस्तीसवर्षीय महिला राहते. मंगळवारी (ता. १६) नातेवाईक असलेला आहेर हा त्यांच्या घरी आला. मुक्काम आणि पाहुणचारही झाला; पण कपाटातील दागिन्यांवर आहेरची नजर गेली.
घरमालकाच्या नकळत आहेरने घरातील प्लायवूडच्या कपाटातील एका कप्प्यात ठेवलेले पाच तोळ्यांचा हार, दोन तोळ्यांच्या बांगड्या व पाच ग्रॅमचे टॉप्स लंपास केले आणि त्यानंतर गावाकडे धूम ठोकली. कपाटातील कप्प्यात दागिने नसल्याची बाब लक्षात येताच महिलेचा संशय बळावला.
महिलेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यात आहेरविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे व त्यांच्या पथकाने तपास केला. दुसरीकडे नातेवाईक महिला आपल्याविरुद्ध तक्रार देणार नाही आणि पोलिस आपल्यापर्यंत पोचणार नाहीत, असा फाजील आत्मविश्वास आहेरचा होता; पण पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला श्रीरामपूर येथून अटक केली.