पावसाने गाठली सरासरीची नव्वदी
पुणे – मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर समाधानकारक “कमबॅक’ केले असून राज्यात सरासरीच्या 90 टक्के पाऊस बरसला आहे.
कृषी विभागाने याबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात राज्यात साधारणत: 24 ऑगस्टपर्यंत सरासरी 860 मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरी 781.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील नंदुरबार, सोलापूर आणि बीड हे तीन जिल्हेवगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 900 टक्यापेक्षा अधिक, तर काही ठिकाणी 75 ते 100 टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे.
पावसाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 75 ते 100 टक्क्यांदरम्यान 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. तर 100 टक्यांपेक्षा जास्त पाऊस 14 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. त्यात पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्येसुद्धा जास्त पाऊस झाला आहे. सिंधूदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे.
सर्वच धरणांतून विसर्ग मंदावला
पुणे शहर आणि जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून सध्या 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. विशेषत: घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वच धरणे 100 टक्के भरली आहेत. सध्या खडकवासला धरणातून 1,712, पानशेत-990, वरसगाव-888, पवना-1,472 भाटघर- 1,071, चासकमान- 740, घोड-4,560, डिंभे-914, निरा-750, भाटघर-2,614 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.