पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Varsha-Gaikwad-1.jpg)
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश दिला. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.
तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.
कोणकोणत्या परीक्षा रद्द?
- पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
- नववी ते अकरावी – 15 एप्रिलनंतर परीक्षा
- दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील.
- पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल
- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करुन निकाल दिला जाईल
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)