पश्चिम महाराष्ट्रावर तिहेरी संकट!
- दुष्काळ, पूर आणि अवकाळी पावसामुळे उसाला फटका, साखर उद्योग धोक्यात
सुरुवातीस दुष्काळ, मग महापूराने हैराण केलेल्या पश्चिम महाराष्ट्राला आता लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून खरिपाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटणार आहे. याशिवाय या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या उस पिकालाही याचा फटका बसला असून, यामुळे साखर उद्योगही धोक्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या महापुरापाठोपाठ लांबलेल्या पावसाने आता शेतीबरोबरच ग्रामीण अर्थकारणच धोक्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्य़ांतील काही दुष्काळी भाग सोडला तर हा भाग शेतीसाठी सुपीक मानला जातो. परंतु गेली दोन वर्षे या भागावर अवर्षणाचे सावट पसरलेले आहे. यातच या वर्षी या अतिवृष्टीची भर पडल्याने दुष्काळापाठी आलेल्या ओल्या दुष्काळाने इथली शेती आणि शेतकरी संपूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे.