पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे पुणेकरांचा कल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ganpati-672x420.jpg)
आदिवासी भागांतील कलाकारांनी घडविलेल्या मूर्तीना मागणी
पुणे – “आदिवासी भागांतील कलाकारांनी घडविलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीं पुणेकरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अतिशय बारकाईने, सुरेख नक्षीकाम करत घडविलेल्या या मूर्तींना नागरिकांकडून चांगली मागणी होत असून, या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच आदिवासी भागातील मूर्तीकारांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नदीकाठची माती, जलरंग यांच्या वापर करून या मूर्ती घडविल्या जातात.’
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनाने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा, असे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध स्वयंसेवी संस्थांकडून नेहमी केले जाते. शहरी भागात पर्यावरणपूरक मूर्तीची गरज लक्षात घेत मनीष बुरूडकर या तरुणाने यवतमाळ येथील वणी या गावातील आदिवासी मूर्तीकारांकडून मुर्तीविकत घेत ती शहरी भागात विकण्यास सुरवात केली. गेली तीन वर्षे तो या व्यवसायात सहभागी असून दिवसेंदिवस पर्यावरणपूरक मुर्तीसाठी मागणी वाढत असल्याचे मनीषने सांगितले आहे. या मुर्ती प्रामुख्याने नदीपात्रातील मातीपासून बनविलेल्या असतात. या मूर्ती घडविण्यासाठी गावातील कलाकार दिवसरात्र काम करत असतात.
हाताने बनवित असल्याने एका दिवसात केवळ चार ते पाच मूर्ती बनविल्या जातात. त्यामुळे या मुर्तीची संख्या कमी असून त्यांच्या किमती जास्त असतात. मात्र, एकाच वेळी जास्त मूर्ती विकल्या जात आसल्याने कलाकारांकडूनदेखील यासाठी पसंती दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरी भागात या मूर्तींची किंमत एक हजार ते बाराशे रुपये इतकी असते.
मूर्तींसाठी होणारी मागणी पाहाता, मांजरी येथे बुरूडकर यांनी एक कार्यशाळा सुरू केली असून या ठिकाणी पाच ते सात कलाकार मुर्ती घडविण्याचे काम करतात. मात्र पर्यावरणपूरक मुर्तींबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे. तसेच, या मुर्ती घडविण्यासाठी कलाकारांना चांगले प्रशिक्षण दिल्यास, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच मुर्तींच्या किमतींवरही त्याचा प्रभाव होण्याची शक्यता असल्याचे मत बुरूडकर यांनी व्यक्त केले.
शेणा-मातीच्या मुर्तींचाही पर्याय
गोपालकृष्ण गोसेवा प्रतिष्ठानतर्फे पुण्यातील औंध येथे देशी गाईचे शेण, माती आणि गोमुत्र यांच्यापासून बनविली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती पूर्णत: वैदिक पद्धतीने बनविण्यात आली असून ती केवळ 20 मिनिटांत पाण्यात विरघळते. नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या या मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही तसेच ते पाणी शेतीसाठी वापरल्यास त्याचा खत म्हणून उपयोग होत असल्याचे प्रतिष्ठानचे अमोल शिंदे यांनी सांगितले.