breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पंतप्रधानांच्या सभेत पाण्याअभावी बसवून ठेवलेल्या शाळकरी विद्यार्थींनी मृत्यू
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. क्षितीजा बाबूराव गुटेवार (१२) रा. शिवाजी वार्ड पांढरकवडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
क्षितीजा ही पांढरकवडा येथील जिल्हा परिषद विद्यालयाची (माजी शासकीय विद्यालय) सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. पांढरकवडा येथे शनिवार १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच आॅटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता आणि सात वर्षाचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यातच सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. घसा कोरडा पडत असताना दूरदूरपर्यंत पाणी दिसेनासे झाले. त्यातच गर्दी असल्याने तेथे अडकलेल्या महिलांना बाहेर निघणेही कठीण होते. कुणी निघण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलिसांकडून आडकाठी आणली जात होती.
शिवाजी वार्डात शोककळा
क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. तिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर क्षितीजाची आई ही मुलांसह माहेरी पांढरकवडा येथे रहायला आली. क्षितीजाच्या आईला आजोबांनी घर बांधून दिले व घरीच छोटेसे किराणा दुकान लावून दिले. क्षितीजाचा मामा विनोद पेंटावार पांढरकवडा येथे पानटपरी चालवितो. क्षितिजाच्या निधनाने शिवाजी वार्डात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, यवतमाळ पांढरकवडा येथे पंतप्रधानांच्या सभेत पाण्याअभावी शाळकरी अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. राजकीय सभांना ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना तासनतास अन्न पाण्यावाचून बसवून ठेवले जाते. त्यामुळे व आयोजकांच्या दुर्लक्षितपणामुळे या मुलीचा मृत्यू झाला या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांनी निषेध केला आहे.