नोटा हा पर्याय नाही, योग्य वाटत असेल त्याला मत दिलं पाहिजे – भैय्याजी जोशी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Bhaiyyaji-Joshi.jpg)
नागपूर : नोटा हा पर्याय नसून जो उमेदवार योग्य वाटत असेल त्याला मत दिलं पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. भैय्याजी जोशी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह नागपुरमधील महाल येथील स्वर्गीय भाऊजी दफ्तरी विद्यालयात गुरुवारी सकाळी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे मतदान केंद्रावर दोघेही सर्वात पहिले पोहोचले होते.
यावेळी बोलताना भैय्याजी जोशी यांनी सांगितलं की, मतदान शांततापूर्ण पार पडावं अशी अपेक्षा आहे. शांतपणे सर्व प्रक्रिया पार पडावी यासाठी लोकांनी मदत करावी असं आवाहन करतो. जे सरकार निवडणूक येईल ते देशहातिसाठी काम करेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नोटासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक व्यक्तीने आपलं मत नोंदवलं पाहिजे. नोटा हे मत व्यक्त करण्याचा पर्याय नाही. जो योग्य वाटेल त्याला मत दिलं पाहिजे’. देशासाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असून स्थिर सरकार देणं लोकांची प्राथमिकता असली पाहिजे. स्थिर सरकार देशाची गरज आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.