नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही – शरद पवार
![The state government provided the best lawyer in the country to maintain the Maratha reservation - Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sharad-pawar-1.jpg)
तुळजापूर – राज्यात परतीच्या पावसामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कालपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज तुळजापुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार आहे’, असे शरद पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याच्या विषयावर बोलताना, संपूर्ण कर्जाच ओझं राज्य सरकारला एकट्याला झेपेला का? असा मुद्दाही पवारांनी उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आधी कधी आलं नाही, इतकं मोठं संकट राज्यावर आलं आहे. गावपातळीवर रस्ते खराब झाले आहेत. यामध्य मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. अतिवृष्टीचा ऊसाला मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचही मोठं नुकसान झालंय’, असे शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा’, असे शरद पवार म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार म्हणाले, ‘संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीने एकाच ठिकाणी थांबून प्रशासकीय निर्णय घेणे गरजेचे आहेत. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत थांबण्यास सांगितले आहे. मुंबईत सर्व कार्यालये असल्याने निर्णय प्रक्रिया वेगाने पार पडेल. मला स्वस्थ बसवत नसल्यामुळे मी दौऱ्यावर आला आहे. गेल्या 53 वर्षात लोकांनी मला एकदाही घरी बसवले नाही. त्यामुळे संकटाच्या काळात या लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.