निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही; काळजी घेण्याचा सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nipah-virus-1-1.jpg)
मुंबई : केरळमध्ये थैमान घालणाऱ्या निपाह विषाणूचा कोणताही धोका महाराष्ट्राला नाही, असे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेऊन दक्षता घेण्यासंबंधित सूचना जारी केल्या आहेत. भारतात निपाह व्हायरसच्या रुपाने नवे संकट समोर उभे राहिले आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. निपाह विषाणूचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची बैठक झाली, ज्यामध्ये दक्षता घेण्यासंबंधित चर्चा करण्यात आली.
निपाह विषाणू संसर्गजन्य असल्याने आजच्या बैठकीत राज्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स तयार ठेवणे, डॉक्टर्स आणि नर्सेसने मास्क आणि ग्लोव्हस सारखे प्रोटेक्टिव्ह गियर्स वापरून विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये H1N1 साठी तयार असलेले आयसोलेशन वॉर्ड्स अशा रुग्णांसाठी वापरले जातील.
सुट्टीचे दिवस असल्याने महाराष्ट्रातून केरळात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे पर्यटक आढळल्यास त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
आरोग्य विभागाकडून सूचना काढून do’s & don’t ची यादी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात निपाह विषाणूचा कुठलाही धोका नसून अजून एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.