नारायण राणे वैफल्यग्रस्त, सरकारला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही – अनिल परब
![Action will be taken against Union Minister Narayan Rane's Neelratna bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/narayan-rane01.jpg)
मुंबई – नारायण राणेंकडून प्रमाणपत्र घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. विरोधक निराश आहेत, हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना पाच वर्ष आरोप करण्याशिवाय दुसरं काम असणार नाही, अशा शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यावर टिका केली आहे.
नारायण राणे राज्यातल्या महाविकास आघाडीवर सध्या आक्रमकपणे टीका करत आहेत. यावर परब यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. परब म्हणाले की, शेतकऱ्यांना सरकारनं सुरुवातीलाच कर्ज माफी दिली आहे. कोरोनात जगाची दैना झाली आहे. कधी कधी कर्ज काढावं लागतं, राज्याची पत आहे म्हणून कर्ज मिळातं असंही ते म्हणाले. मेट्रोकार शेडच्या जमिनीबाबत आम्ही अभ्यास करूनच निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व तयारी झाली असून कुठलीही अडचण येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. हा विषय कोर्टात असून सरकार पूर्ण ताकदीने बाजू मांडत आहे.
उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना परब म्हणाले, त्यांचा शिवसेना प्रवेश हा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यांचं नाव विधान परिषदेसाठी पाठवलेलं आहे. राज्यापालांना पाठवलेली सर्व नावे ही कॅबिनेटची मान्यता घेऊन पाठवलेली आहेत. आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.